कोण होणार गांव चा कारभारी ..!
मंगळवारी होणार माळशिरस तालुक्यातील १०३ सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील एकूण १०३ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे सन २०२५ – २०३० या आरक्षण सोडत काढणेकामी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांनी तहसिलदार माळशिरस यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्व १०३ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० साठीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम मंगळवार १५/०७/२०२५ रोजी सकाळी ठिक १२.०० वाजता पंचायत समिती, सभागृह माळशिरस येथे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे. आरक्षण सोडतीचे वेळी आरक्षण सोडतीस इच्छुक असणाऱ्या नागरीकांनी उपस्थित राहावे यासाठी तहसीलदार यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
सरपंचासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. २००५, २०१०, २०१५ व २०२० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती व सध्याच्या आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीच्या चिठ्या पहिल्या बरणीत (नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी) ठेवल्या जाणार आहेत. पहिल्या बरणीतून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करून दिलेल्या जागांच्या संख्येइतक्या चिठ्या काढल्या जाणार आहेत. या चिठ्या दुसऱ्या भरणी ठेवून त्यातून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षणाच्या संख्येइतक्या चिठ्ठया काढल्या जाणार आहेत.
नव्याने आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका कधी जाहीर होतात? याकडे गावगाड्यातील इच्छुक सरपंच ,सदस्य त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.




