विहिरीत पडलेल्या ६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या तांदुळवाडीच्या इरफान मुजावर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते गौरव !
भूमीपुत्र न्यूज
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी काढले. पंढरपूर-सातारा मार्गावरील तांदुळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात विहिरीत उडी घेऊन ६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या तांदूळवाडी येथील धाडसी युवक इरफान मुजावर यांचा नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन एक पिकअप गाडी पंढरपूर तालुक्यातील रांजणीकडे निघाली होती. पंढरपूर – सातारा मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ ही पिकअप रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये कोसळली. या दुर्दैवी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता.इरफान मुजावर यांचे अंगावर काटा आणणारे धाडसहा अपघात घडला तेव्हा इरफान मुजावर हे स्वतःच्या गाडीने याच पिकअप वाहनाच्या पाठीमागून जात होते. डोळ्यांदेखत गाडी विहिरीत पडल्याचे पाहताच, त्यांनी कसलाही विचार न करता नागरिकांचे जीव वाचवण्याच्या उद्देशाने तात्काळ पावले उचलली.त्यांनी सर्वप्रथम गावातील आपल्या सहकारी मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि मदतीसाठी बोलावले.कोणाचीही वाट न पाहता त्यांनी स्वतः धाडसाने विहिरीत उडी घेतली.विहिरीच्या पाण्यात बुडणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीसह तब्बल ६ जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.इरफान मुजावर यांच्या या अद्भूत धाडसाचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी इरफान मुजावर यांचा विशेष सत्कार केला.या सन्मानाबद्दल इरफान मुजावर यांच्यावर माळशिरस तालुका आणि तांदुळवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
”जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे इरफान मुजावर यांचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एका चिमुकलीसह ६ जणांना जीवदान दिले, त्यांच्या या शौर्याचा अभिमान वाटतो.”— सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री




