“तुलशा ढापच्या पाडा शिरपूर”
वेळापूरचे सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे यांनी सुतावरून गाठला स्वर्ग

भूमीपुत्र न्यूज
ग्रामीण बोलीभाषेत सुतावरून स्वर्ग गाठणे ही म्हण प्रचलित असून याच म्हणीचा नुकताच प्रत्यय वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे यांच्या बाबतीत आला आहे . अल्प व त्रोटक माहितीवरून वेळापूर पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती आपले योगदान देत नातेबंधाचे बंध प जोडून दिल्याने वेळापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने 3 मार्च ते 17 मार्च 2023 पर्यंत हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे कामकाज सुरू असताना वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे व हवालदार मच्छिंद्र राजगे यांना मळोली येथील डॉ जाधव यांनी साळमुख चौकात एक दबलेला पिचलेला इसम विवळत पडलेला आहे अशी माहिती दिल्यानंतर तात्काळ साळमुखचे पोलीस पाटील प्रशांत मदने व ग्राम सुरक्षा दलाचे विजय सूळ, चंद्रकांत महाडिक, प्रदीप मदने यांच्या मदतीने सदर व्यक्तीस खाण्यास दिले व त्याची विचारपूस केली असता तो फक्त तुलशा ढापच्या पाडा शिरपूर एवढेच बोलत होता या व्यतिरिक्त काहीच बोलत नव्हता.

यानंतर पोलिसांनी या इसमास ॲम्बुलन्स द्वारे अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आणि येथूनच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे यांनी चौकशी सुरू केली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ढावच्या पाडा या ग्रामपंचायतीतील पावरा नावाच्या ग्राम पंचायत सदस्यास संपर्क करण्यात आला व सदर इसमाचे फोटो पाठविण्यात आले यानंतर या ग्रामपंचायत सदस्याने ढावच्या पाडा या गावातील शब्बीर तुळशीदास पावरा असे या इसमाचे नाव असून सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी साठी हा इसम आला असता गेल्या चार महिन्यापासून तो बेपत्ता आहे त्याचे कुटुंबीय त्याची चौकशी करीत आहेत परंतु तो आढळून येत नाही असे सांगितले फोटो वरून ओळख पटल्यानंतर सदर इसमाचे वडील तुळशा परशा पावरा व भाऊ नामदेव तुलशा पावरा हे या इसमास नेण्यासाठी निघाले आहेत.
यामुळे तुलशा ढापच्या पाडा एवढेच बोलणाऱ्या या शब्बीर नावाच्या इसमास आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी वर्दीतल्या दर्दी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे व हवालदार मच्छिंद्र राजगे यांनी चोखपणे माणुसकीची भूमिका बजावली असल्याने सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे .




