माळशिरस तालुकासामाजिक

मराठा समाजाचा आक्रोश….मंगळवारी माळशिरस तालुक्यात चक्काजाम व बंद

भूमीपुत्र न्यूज

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा समाज बांधवांवर अमानुषपणे झालेला गोळीबार व लाठी चार्जच्या निषेधार्थ मंगळवार दि 5 सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यात 8 ठिकाणी चक्काजाम व माळशिरस तालुका सकाळी 8 ते दुपारी 12 वा पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने रविवार दि 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आला.

यावेळी विचार पिठावर महिला भगिनी उपस्थित होत्या प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले आणि जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

माळशिरस तालुका सकल मराठा समाजाची बैठक अकलूज येथील कृष्णप्रिया हॉलमध्ये रविवारी सायंकाळी 5 वा संपन्न झाली या बैठकीसाठी संपूर्ण तालुका भरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजावर व माता-भगिनींवर अमानुषपणे झालेल्या गोळीबार व लाठी चार्जचा तीव्र शब्दात अनेकांनी निषेध व्यक्त करून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना व लाठी चार्जचे आदेश देणाऱ्या राजकर्त्यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही अशा तीव्र शब्दात भावना मराठा समाज बांधवांनी व्यक्त केल्या.

यावेळी सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार डॉक्टर ,मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा वगळता माळशिरस तालुक्यात 8 ठिकाणी चक्काजाम करून संपूर्ण तालुका सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली .

यानुसार नातेपुते दहिगाव चौक , माळशिरस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ,पाणीव पाटी चौक ,वेळापूर येथील पालखी चौक ,श्रीपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लवंग 25 /4 या ठिकाणचा रस्ता, अकलूज महर्षी चौक व साळमुख चौक या ठिकाणी चक्काजाम करून तालुक्यात कडकडीत बंद पाळणार असल्याचे सांगण्यात आले अकलूज येथे झालेल्या बैठकीत प्रकाश पाटील पाणीवकर, धैर्यशील मोहिते पाटील, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे ,धनंजय माने साखळकर, कमलाकर माने देशमुख,प्रा. मीनाक्षी जगदाळे ,अरुंधती हजारे ,दीपक पाटील ,राहुल बिडवे ,योगेश केदार, संजय मगर ,रणजीत कदम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांनी मानले.

जालना जिल्ह्यात मराठा समाज बांधवांवर अमानुषपणे झालेला गोळीबार व लाठी चार्जचा आदेश पोलिसांना कोणी दिला ? याची माहिती मराठा समाजाला मिळणे गरजेचे आहे गोळीबार व लाठी चार्ज चा आदेश देणाऱ्याला मराठा समाज योग्य तो धडा शिकवेल.
प्रकाश पाटील, पाणीवकर

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी आवश्यक आहे आंदोलनानंतर पुढे काय ? सातत्याने याचा विचार व्हायला हवा तरच आरक्षण मिळेल योग्य ते नियोजन करून समाजातील हुशार लोकांनी यावर काम करणे गरजेचे आहे अन्यथा मराठा समाजाच्या आरक्षणाचे पानिपत होईल.
धैर्यशील मोहिते पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!