होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी २९ जूनपासून माळशिरस तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन; सुहास बिरलिंगे यांचे आवाहन

भूमीपुत्र न्यूज
होलार समाजाच्या प्रलंबित न्याय हक्कासाठी आणि प्रदीर्घ मागण्यांसाठी ‘होलार समाज यंग ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून तहसील कार्यालय, माळशिरस येथे बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे.
होलार समाजातील बांधवांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, समाज बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माळशिरस तालुका अध्यक्ष सुहास बिरलिंगे यांनी केले आहे.
होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने तातडीने ‘स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, समाजातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळातर्फे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात यावे.महामंडळातून कर्ज मंजूर करताना जाचक ठरत असलेली ‘शासकीय जामीनदाराची’ अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
त्याऐवजी कर्जदाराचे स्वतःचे प्रतिज्ञापत्र (Affidavit) तसेच त्याच्या स्वतःच्या घराचे व जमिनीचे उतारे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावेत,होलार समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती स्पष्ट होण्यासाठी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, होलार समाजाच्या शासकीय कागदपत्रांमध्ये झालेल्या चुकीच्या जातीच्या नोंदींचा तातडीने सर्व्हे करण्यात यावा आणि शासनाने स्वतः पुढाकार घेऊन या चुका दुरुस्त करून द्याव्यात या मागण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.
होलार समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. हा लढा आपल्या हक्काचा असून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील समस्त होलार समाज बांधवांनी सोमवार, २९ जून रोजी सकाळी १० वाजता माळशिरस तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले संघटन दाखवून द्यावे.
“सुहास बिरलिंगे (तालुका अध्यक्ष, होलार समाज यंग ब्रिगेड, माळशिरस)




