देशप्रेमाचा अनोखा धागा: माळशिरसच्या वाघमोडे कुटुंबाने सैनिकांसाठी हाताने तयार करून पाठवल्या ६,००० राख्या!

भूमीपुत्र न्यूज
रक्षाबंधनाचा पवित्र सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबाने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कुटुंबातील सदस्यांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या लाडक्या सैनिकांसाठी तब्बल ६,००० राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत. या सर्व राख्या सीमाभागात तैनात असलेल्या जवानांसाठी रवाना करण्याचा भव्य कार्यक्रम दिनांक १५ जुलै २०२६ रोजी माळशिरस पंचायत समिती येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

राज्याचे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत आणि डीवायएसपी प्रदीप गोरड यांच्या शुभहस्ते या राख्या जवानांसाठी रवाना करण्यात आल्या.

या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे, भोसले साहेब, पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे, सुभेदार मेजर राजू खराडे (वेळापूर), ऑनररी नायब सुभेदार राजू पाटील (नातेपुते), सुभेदार मोरे महाराज (नातेपुते), मारुती वाघमोडे आणि हरिश्चंद्र साळुंखे उपस्थित होते.तसेच वीरपत्नी सिंधू ढोबळे, वीरपत्नी शोभा सावंत, नगरसेविका ॲड. रेश्मा टेळे, नगरसेविका पुष्पाताई कोळेकर, विष्णू गोरड, शिवाजी गोरड, विकास कोळेकर,बापू वाघमोडे, वंदना कोळेकर,अहिल्या वाघमोडे, राणी साठे, पूजा ढावरे,मकरंद कुदळे,नितीन गायकवाड, सचिन गाडेकर,जगदीश राजमाने, पत्रकार भारत मगर, एल. डी. वाघमोडे, निनाद पाटील, लक्ष्मण कुरुडकर, स्वप्निल राऊत,संजय हुलगे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघमोडे कुटुंबाने गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू केली होती. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कामात स्वतःला झोकून दिले. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, केवळ सैनिकांबद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतून या कुटुंबाने हा ६,००० राख्यांचा संकल्प पूर्ण केला.
“आपण आपले सण-उत्सव आपल्या घरात सुरक्षितपणे साजरे करू शकतो, कारण आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्यांच्या मनगटावर आपल्या प्रेमाची राखी बांधली जावी आणि त्यांना घरच्यांची कमतरता भासू नये, याच एका भावनेने आम्ही या राख्या बनवल्या आहेत.
“सौ. शोभा तानाजी वाघमोडे (संकल्पक)
राख्या बनवण्यासाठी सुती दोरे, मणी आणि कुंदन या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.प्रत्येक राखी हाताने ‘तिरंगा’ रंगात अत्यंत आकर्षक पद्धतीने विणण्यात आली आहे.केवळ राखीच नाही,तर प्रत्येक सैनिकाला कृतज्ञता व्यक्त करणारे आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे एक भावनिक पत्रही सोबत पाठवले आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबाने स्वतःच्या खर्चाने आणि वेळेची गुंतवणूक करून राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार सावता गोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पत्रकार निनाद पाटील यांनी मानले.




