मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंपी समाजाच्या विविध मागणीचे निवेदन, मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

भूमीपुत्र न्यूज
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 23 जुलै रोजी पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज व श्री संत जनाबाई महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सहसंयोजिका डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी मुख्यमंत्र्यांना नामदेव शिंपी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात पंढरपूर येथे नामदेव महाराजांचे स्मारक , नामदेव मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिंपी समाजाच्या उन्नती करिता विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नामदेव महाराजांनी केलेले कार्य, दिलेले विचार सर्वसमावेशक व प्रेरणादायी आहेत, मराठवाडा ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पंजाबमधील घुमान पर्यंत त्यांनी त्या कालखंडात केलेला प्रवास, लोकोत्तर कार्य हाच आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांनी अनेक कामांतून समाजाला दिशा देण्याचे काम केले. यामुळेच आजही नामदेव शिंपी समाज सहिष्णू, लोकोपयोगी व सर्वसमावेशक विचारांचा आहे.
नामदेव शिंपी समाजाची लोकसंख्या कमी असल्याने, हा समाज सहिष्णुता पाळणारा असल्यामुळे या समाजाकडे मात्र राजकीय दृष्टीने पाहिले जात नाही व परिणामी आम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत नाही. तेव्हा आपणाकडे या निवेदनाद्वारे मागणी आहे कि योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले .




