अकलूजच्या प्रांत कार्यालयासमोर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाळला पुतळा

भूमीपुत्र न्यूज
14 फेब्रुवारी 2023 पासून अकलूज च्या प्रांत कार्यालयासमोर खंडकरी शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाने गुरुवार दिनांक 16 रोजी आक्रमक स्वरूप धारण केल्याचे दिसून आले शेतकऱ्यांच्या विविध व न्याय स्वरूपाच्या असणाऱ्या मागण्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा प्रांत कार्यालयाच्या समोर जाळण्यात आला .

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर श्रीपुर व शिवपुरी मळा यासह 22 गावातील खंडकरी शेतकरी अकलूजच्या प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहेत खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड सोमनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या या उपोषणाद्वारे प्रशासनाकडे शेतकऱ्यांना मागणीनुसार व नियमानुसार शेत जमीन मिळावी, नमुना क्रमांक एक मंजूर झाला आहे त्या शेतकऱ्यांना पसंतीची जमीन उपलब्ध करून द्यावी, वर्ग क्रमांक दोनच्या ऐवजी वर्ग एक करून जमिनी मिळाव्यात, मिळालेल्या जमिनीची मोजणी, गटाची फाळणी करून हद्दी खुना करून द्यावी, ज्यांची जमीन एकेकरांपेक्षा कमी आहे त्या खंडकऱ्यांना एकर द्यावी, जमीन वाटप करताना पाठ -पाणी व रस्ता द्यावा, चारी किंवा रस्ता गेला आहे ते क्षेत्र वगळून जमिनीचे वाटप करून द्यावे, अनुभवी प्रांताधिकारी किंवा फक्त खंडकरी प्रशासनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा,औ खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप होईपर्यंत संयुक्त शेती भाडेतत्त्वावर जमिनी देऊ नयेत त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये सन 2012 पासून जमीन वाटपापासून वंचित राहिलेल्या खंडकरी वारसांना संयुक्त शेतीसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या दराप्रमाणे जमीन मिळेपर्यंत नुकसान भरपाई मिळावी.
या प्रमुख मागण्यांवर साखळी उपोषण करणारे शेतकरी ठाम असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सोडणार नाही असे सांगत आहेत या उपोषणास माजी पालकमंत्री आ दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे उत्तम जानकर, सुरेश पालवे, भानुदास सालगुडे पाटील ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, युवा सेनेचे गणेश इंगळे ,रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे ,जनसेवा संघटनेचे दादा जाधव , मा उपसभापती किशोर सूळ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष राऊत, शहराध्यक्ष अनिल बंदपट्टे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला
पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतळ्याला गुरुवारी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी चपला मारून तो जाळण्यात आला यानंतर तरी गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाकडे हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का ? प्रशासनाकडे हेलपाटे मारून गेल्या दहा वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आपला प्राण त्याग केला आहे यामुळे आता तरी प्रशासन जागे होणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे .




