माणदेशी साहित्यिक शिवाजी बंडगर यांच्या हेडाम : जगण्याचे जुगाड या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन
भूमीपुत्र न्यूज
हेडाम कादंबरी आपणास जिंकेपर्यंत लढायला शिकवते.त्याप्रमाणे युवकांनी जिंकेपर्यंत लढत राहिले पाहिजे,असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.माणदेशी साहित्यिक शिवाजी बंडगर यांच्या हेडाम : जगण्याचे जुगाड या समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
नागू वीरकर लिखित हेडाम ही बहुचर्चित कादंबरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए.भाग दोन च्या मराठी अभ्यासक्रमासाठी नेमलेली आहे.त्या कादंबरीवर आधारित माणदेशी साहित्यिक शिवाजी बंडगर यांनी हेडाम : जगण्याचं जुगाड हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे.या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते विद्यापीठात नुकतेच झाले.यावेळी बोलताना कुलगुरू श्री.महानवर पुढे म्हणाले की, हा समीक्षा ग्रंथ अभ्यासकांना बहुमोल मार्गदर्शन करणारा ठरेल.हेडाम कादंबरी जिंकेपर्यंत लढायला शिकवते आणि लढाईचा संपूर्ण इतिवृत्तांत,सर्व घटनांचा लेखाजोखा या समीक्षा ग्रंथातून अभ्यासावयास मिळतो आहे.लेखक नागू वीरकर,समीक्षक शिवाजी बंडगर आणि मीही माझ्या आयुष्यामध्ये मुलुख भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचे जीवन अनुभवलेलं असून जिंकेपर्यंतचा प्रवास केलेला आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कठोर परिश्रमास पर्याय नाही, ही खूणगाठ युवकांनी आपल्या मनामध्ये बांधावी असेही ते म्हणाले.
यावेळी नागू विरकर,शिवाजी बंडगर, प्रा.तानाजी कोळेकर,प्रा.दत्ता डांगे,प्रा. वामन जाधव,प्रा.माने, प्रा.श्रीकृष्ण पडळकर, प्रा.दत्ता सरगर,संजय मदने, सुधाकर इनामदार आदी उपस्थित होते.
संयोजक प्रा.डी.आर.गायकवाड यांनी आभार मानले.




