माळशिरसच्या वाघमोडे परिवाराने सीमेवरील जवानांना पाठविल्या साडेपाच हजार राख्या.प्रांताधिकारी विजया पांगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

भूमीपुत्र न्युज
“एक राखी सैनिकांसाठी” ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील तानाजी वाघमोडे व शोभा वाघमोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना ५५०० राख्या पाठविण्याचा कार्यक्रम अकलूजच्या प्रांताधिकारी विजया पांगरकर यांच्या हस्ते माळशिरस पंचायत समिती सभागृह येथे पार पडला.
या राखी देशातील ३५ युनिट मधील जवानांना साडेपाच हजार राख्या पाठविल्या आहेत. सीमेवर कर्तव्यावर असणाऱ्या अथवा निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभाग प्रथम सैनिकांना प्राधान्य दिले जाईल तसा फलकही ही महसूल विभागाच्या बाहेर लावला जाईल असे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी म्हटले. पुढे बोलताना प्रांताधिकारी पांगारकर यांनी वाघमोडे कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच तालुक्यातील प्रत्येक घरातून एक राखी सैनिकांसाठी गोळा केली तर लाखो राख्या माळशिरस तालुक्यातून सीमेवरील सैनिकांना पोहोचतील असे त्यांनी मत व्यक्त केले.
सुभेदार विजयकुमार सावंत यांनी सैनिकांना रेशन कार्ड, सातबारा, घर त्यांच्या नावावर मिळावे अशी मागणी केली. तसेच त्यांनी वाघमोडे कुटुंबाचे कौतुक केले कोणतेही अपेक्षा न ठेवता गेले सहा वर्षे वाघमोडे कुटुंब सीमेवरील जवानांना राख्या पाठवत आहेत. .घरची परिस्थिती साधारण असूनही सैनिका प्रति भावना जपत हे कुटुंब स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवत आहे या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले .
मेजर राजेंद्र आढाव यांनी सैनिकाच्या अडचणी सांगितल्या.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगरकर ,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे एपीआय जानकर, राया ऍग्रो चे मालक शिवाजी गोरड, त्रिदल माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष मेजर राजेंद्र आढाव, ज्येष्ठ सैनिक अधिकारी कप्तान लक्ष्मण माने, सैनिक संघटना तालुका अध्यक्ष नायब सुभेदार सुरेश तोरसे, माजी सैनिक अधिकारी सुभेदार राजू खराडे, सैनिक मित्र सोलापूर एसपी ऑफिस सुभेदार विजयकुमार सावंत, माजी सैनिक मारुती वाघमोडे, बापू वाघमोडे, रत्नप्रभा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर, रत्नप्रभादेवी बिजो.सह. संस्थेचे उपाध्यक्ष सूजित तरंगे , पत्रकार आनंद शेंडगे ,संजय हुलगे ,स्वप्निल राऊत, शिवाजी पालवे, कृष्णा लावंड , ॲड रूपाली गोरे ,गोफने , वाघमोडे परिवार तसेच माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर सावता गोरे यांनी केले तर आभार सुभेदार विजयकुमार सावंत यांनी मानले.
रक्षाबंधन या सणाचे खरे मानकरी तर सीमेवरील सैनिक आहेत . आपण सैनिकांना सीमेवर राख्या पाठवायच्या का? ही गोष्ट मी कुटुंबासोबत शेअर केली असता संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले. सुरुवातीला केवळ ५०० राख्या तयार केल्या होत्या व ५ युनिटला राख्या पाठविण्यात आल्या होत्या दरवर्षी त्यात वाढ करून यावर्षी म्हणजे २०२५ मध्ये ५,५०० राख्या तयार करण्यात आल्या व जवळपास ३५ युनिटला या राख्या पाठवण्यात आल्या आहेत .राख्या पाठवण्याचे हे ६ वे वर्ष आहे. राख्या मिळाल्यानंतर जवानांच्या आलेल्या प्रतिक्रिया खरच मानसिक समाधान मिळवून देते,यापुढेही माझ्याकडून हे काम चालूच राहील.
शोभा तानाजी वाघमोडे (पत्रकार,समाजसेविका,माळशिरस)




