मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा आ. राम सातपुते यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाज हा आरक्षण विषयावर आंदोलन करीत आहे. मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्व योगदान दिले आहे व देत आहे. मराठा समाजातील मुख्य व्यवसाय हा शेती असून 99% मराठा समाज हा अल्पभूधारक आहे. मराठा समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मराठा समाजास आरक्षण नसल्याने गरीब मराठा कुटुंबातील मुले ,मुली अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. यामुळे मराठा समाजास तात्काळ आरक्षण देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशा आशयाचे पत्र माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की , मराठा समाजाची परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे तसेच मी महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य या नात्याने सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी करतो . अशा आशयाची मागणी आमदार राम सातपुते यांनी सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्याकडे केली आहे




