माळशिरस तालुकाशैक्षणिकसामाजिक

33 वर्षांनी झाला “महर्षि प्रशालेच्या” माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

भूमीपुत्र न्यूज

महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,अकलूज येथील 1988-89 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वी च्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा “सोहळा एकमेकांना नव्यानं भेटण्याचा स्नेह मेळावा “मोठ्या थाटात आणि ऊत्साहपुर्ण वातारणात कृष्ण प्रिया हॉल, अकलूज येथे संपन्न झाला.यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक बी.के.मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपिठावर जे.जे.कदम सर,एच.डी.भोसले सर,नरुटे सर,दत्तात्रय शेखदार सर,शेख मॕडम,धायगुडे सर,भगत सर,नारायणकर सर,नानासाहेब सावंत सर,कळसे सर ,के.एस.चव्हाण सर आदी शिक्षक वृंद उपस्थित होता.तर समोर त्यांचे 33 वर्षांपुर्वीचे विद्यार्थी व सध्याचे डाॕक्टर,वकील, अभियंता,साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक,राजकीय पदाधिकारी ,प्राध्यापक,शिक्षक-शिक्षिका,शेतकरी,व्यावसायिक,पत्रकार उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात महर्षि प्रशालेत शिक्षण घेणारे 100 मित्र -मैत्रीणी व त्यांचे नातेवाईक तब्बल 33 वर्षांनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींनी आणि शालेय गप्पांचा फड चांगलाच रंगला होता.या सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी या बॅचचे विद्यार्थी इंजिनियर बबनराव शेंडगे यांनी समर्थपणे पार पाडली.

शिक्षकांनी कर्तव्यात कसर न करता ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले तरच यशस्वी विद्यार्थी तयार होतात.चांगला विद्यार्थी निर्माण करणे हे समाज व देशासाठी गरजेचे आहे.हे सर्व साध्य करण्यासाठी प्रामाणिक कष्टाची गरज आहे. कारण प्रामाणिकपणे कष्ट केले तर आयुष्यात काहीही कमी पडत नसते असा मौलीक सल्ला महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.के.मुळे सर यांनी दिला.

जे.जे.कदम सर यांनी चांगले विद्यार्थी घडणे हेच शिक्षकांचे यश असते.विद्यार्थ्यांनी हिमालयाची ऊंची गाठावी हे आनंददायी असुन आपले सामर्थ्य अन् ऊर्जेचा उपयोगातुन ऊज्वल भविष्य घडते असा सल्ला दिला.प्रत्येकाने येणाऱ्या क्षणाचा आनंद घेण्याची सकारात्मक मानसिकता ठेवावी.आपल्या मनात कधीही अहंकार आणि अभिमान जागा होवु देवु नका असा मोलाचा संदेश दिला.

पोपट भोसले सर यांनी विद्यार्थी किती मोठे झाले तरी ते खिडकीतून बाहेर पाहणारी अल्लड मुले आणि बोरे खावुन आटोळ्या टाकणाऱ्या खोडकर मुलीच असतात असे सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अॕड .भारत गोरवे यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणी जागवल्या,तर आनंदनगरच्या माजी सरपंच मेघना राऊत-इनामके यांनी शालेय जिवनातील मैत्रीणीच्या गोड आठवणींना उजाळा दिला शेख मॕडम यांनी पन्नाशीतील विद्यार्थ्यांचा गाण्याचा तास घेतला.फनी गेम्सचा आनंद लुटत एकमेकांना पुन्हा नव्यानं भेटण्याचा संकल्प करीत 33 वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रीणींनी आठवणींचे मखमली क्षण अनुभवाच्या शिदोरीत साठवुन परतीचा प्रवास धरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबनराव शेंडगे,नवनाथ सावंत,जितेंद्र शिंदे,विजयकुमार पाटील,अॕड.भारत गोरवे,भागवत आवताडे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभियंता बबनराव शेंडगे यांनी तर सुत्रसंचालन गुजर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!