गिरवी येथे शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने भव्य “होम मिनिस्टर व जनहित जागर मेळावा” उत्साहात संपन्न!

भूमीपुत्र न्यूज / शाहरुख मुलाणी
शेतकरी व नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा; इंधन बचत हीच राष्ट्रसेवा: शरद (बापू) मोरे यांचे आवाहन
गिरवी येथे शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य “होम मिनिस्टर व जनहित जागर मेळावा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला महिला, युवक, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शरद (बापू) मोरे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. ऋतुजाताई शरद मोरे, सौ. अश्विनीताई रमेश मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘होम मिनिस्टर’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादमेळाव्यात महिलांसाठी खास मनोरंजनात्मक “होम मिनिस्टर” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळ, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.जनहित जागर मेळाव्यातून विविध योजनांचे मार्गदर्शनयावेळी आयोजित जनहित जागर मेळाव्यात शासनाच्या विविध योजना, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बचत गट, शेती, रोजगार आणि सामाजिक उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी समाजाने एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
“सामाजिक कार्य, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर शिवप्रसाद उद्योग समूह कायम जनतेसोबत राहील. समाजहिताच्या उपक्रमातून गावागावात जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”
मा. श्री. शरद (बापू) मोरे (अध्यक्ष, शिवप्रसाद उद्योग समूह)
इंधन बचत आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर काळाची गरजआपल्या भाषणात देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना शरद मोरे यांनी पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे इंधन दरांवर होणारा परिणाम अधोरेखित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा संयमाने वापर करण्याच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवत, सर्व शेतकरी व नागरिकांनी शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा आणि इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.”इंधन बचत हीच राष्ट्रसेवा असून पर्यावरण संवर्धनासाठीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर काळाची गरज आहे,” असे नमूद करत ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांनी आर्थिक बचतीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमाला सेंटर चालक – शुभम जाधव, सुधीर नरुटे, उत्तम कचरे, गणेश जाधव, महादेव पिसे, राहुल कुलकर्णी, किसन मोहिते, सत्यवान राऊत, नारायण कचरे तसेच उद्योग समूहाचे सभासद, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले. या स्तुत्य आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.




